-->

अनुभवातून शिका,अनुभवाचे बोल - स्किल डेव्हलपमेंट काळाची गरज

        गेल्या काही दिवसांपासून यशस्वी अकॅडेमी फॉर स्किल्स मधील श्री संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटरने एक नवीन कौशल्य प्रशिक्षण प्रकल्प सुरू केला आहे. कुठे माहीत आहे.. येरवडा जेलमध्ये हो बरोबर ऐकलत !.. महिला बंदी कारागृहात.. येरवडा, पुणे येथे. फॅशन डिझाइनचा कोर्स आमच्या संस्थेकडून आम्ही नुकताच महिला बंदी कारागृहात राबवित आहोत. यात आम्ही नव-नवीन पॅटर्नचे ड्रेसस आणि ब्लाऊज शिकवित आहे. त्यामध्ये प्लाजो, पटियाला, अनारकली, अम्ब्रेला, प्रिन्सकट ब्लाऊज इत्यादी.. प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे.

        तिला अनुभवसांगायचं झाला तर महिला बंदी कारागृहामधून २० महिलांची बॅच आम्हाला देण्यात आली. एकंदरीत बघितले तर त्या साधारण १८ ते ४० वयोगटातील होत्या. सर्वांच्या चेह-यावर एक ओढ, नवीन काही शिकायला मिळेल अशी इच्छा आणि एक उत्साह दिसत होता.

        मी, आमच्या संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ मॅडम आणि आमच्या संस्थेच्या प्रशिक्षक स्वाती कांबळे मॅडम असे आम्ही उद्घाटन प्रसंगी संस्थेकडून गेलो होतो. उद्घाटन प्रसंगी साधारण ८०-९० महिल्या समोर बसल्या होत्या, त्यांना बघून माझ्या मनात प्रश्नांचा गोंधळ निर्माण झाला. कोण या? कशा इथे आल्या? काय केले असेल यांनी? वगैरे. पण कार्यक्रम सुरू झाला आणि वाटलेच नाही या बंदी आहेत. तिथले वाताबरण त्यांची वागणूक ही सर्व साधारणच होती. उलट त्यांची चपळता, काम कारण्याची पद्धत पाहून आम्हीच दंग झालो. स्मिता मॅडमने त्यांच्या भाषणात या गोष्टींचा उल्लेख देखील केला. त्या महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते किंबहुना म्हणता येईल एक नवीन काहीतरी शिकायला मिळेल याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांचा क्लास सुरू करण्यात आला. आमच्याकडून त्यांना कोर्ससाठी आवश्यक असलेले काही साहित्य देण्यात आले तसेच काही साहित्य कारागृह प्रशासनाकडूनही देण्यात आले आणि त्यांचा क्लास सुरू झाला. स्वाती मॅडम यांचाही अशा ठिकाणी प्रशिक्षण देण्याचा हा तसा पहिलाच अनुभव. त्यांना माहीत नव्हते की तिथल्या त्यांच्या विद्यार्थिनी त्यांना किती समजून घेतील किंवा त्यांना कसे सहकार्य करतील. पण जेव्हा मला त्या येऊन भेटल्या आणि त्यांनी मला त्यांचा अनुभव संगितला की, तिथल्या विद्यार्थिनी त्यांच्या जीवनातील सर्वात बेस्ट विद्यार्थिनी आहेत. एखादी गोष्ट किती आणि कशी समजून घ्यावी ही त्यांच्याकडून शिकावे.

        परवा मी अशीच तपासणीसाठी गेले. आता त्या माझ्यासाठी अनोळख्या नव्हत्याच. मी गेले तर सर्व माझ्या आजूबाजूला येऊन अशा वागू लागल्या की जशा आम्ही अनेक वर्षापासूनच्या मैत्रीणीच आहोत. त्यांनी माझ्याशी त्यांच्या भावनांशी संवाद साधला. त्या जे काही शिकल्यात त्या बनवलेल्या वस्तु (ड्रेस) मला दाखवायला लागल्या. मला त्यावेळी फार कुतूहल वाटले तसेच मला एक समाधान पण वाटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आज झळकत होता. आम्ही पण काहीतरी नवीन करू शकतो असे ते आत्मविश्वासाने आज मला सांगत होत्या.

        खरं पहिले तर समाजाने पण आणि शासनाने पण त्यांच्यासारख्या लोकांसाठी काही करणे आवश्यक आहे. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळणे ही देखील आजच्या काळाची गरज आहे. पण समाजाकडून त्यांचा स्वीकार केला जात नाही. त्यांची शिक्षा संपली तरी त्यांना समाज स्वीकारत नाही, याचा मला खेद वाटतो. चुका माणसांकडूनच होतात. कोणतीही व्यक्ती जन्मतः गुन्हेगार नसतो तर परिस्थिती आणि सभोवतालचा परिसर त्याला ते करण्यास भाग पाडतो. अशा गुन्हेगारांना शिक्षा होणार हे निश्चित आहे. पण शिक्षा संपल्यानंतर पुन्हा सर्वसामान्य नागरी जीवन जगताना समाजाकडून त्यांचा आदर केला जात नाही. म्हणून आज काळाच्या गरजेला ओळखून मी म्हणेल स्किल डेव्हलपमेंटचा प्रसार झाला पाहिजे. सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी समाजाने आज पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे. फक्त महिलांच्याच कारागृहात नव्हे तर पुरुषांच्या कारागृहात देखील असा कौशल्य विकास प्रशिक्षणाचा प्रकल्प राबवण्यात यावा. त्यातून अनेक जणांना पुन्हा नवीन आयुष्याची सुरुवात करताना त्यांना सहजगत्या रोजगाराच्या संधी मिळतील तसेच त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा देतील. मला वाटते हेच खरे पुनर्वसन होईल, चला आज पासूनच नवीन भारताची स्वप्न पाहूया, हो ना !!!


Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close